रोज एक गोष्ट ऐकली की सगळ्या कटकटी दूर पळतात.
२०२० सालात या नॉव्हेल कोरोना व्हायरसने आपल्या भारतात पदार्पण करून सर्वांचं जिणं कठीण करून ठेवलं आहे. लहान मुलांना तर घराच्या चार भिंतीत कोंडूनच राहावं लागत आहे. देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे आणि अशा दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये शिग्गावसारख्या लहानशा गावात राहाणाऱ्या आजी- आजोबांकडे आजोबांची बहीण कमलूआजी, तिची नात आणि आजी-आजोबांची सगळी नातवंडं राहायला आली आहेत.
मास्क शिवण्यात मदत करणं, घरातील वेगवेगळ्या कामांची जबाबदारी उचलणं, गावात थोड्या दिवसांसाठी आश्रयाला येऊन गावच्या मंदिरात राहाणाऱ्या गरीब मजुरांना देण्यासाठी जेवण तयार करणं आणि हे सगळं चालू असताना एकीकडे आजी-आजोबांकडून ऐकलेल्या छान छान गोष्टींमध्ये रमून जाणं, यामुळे हा लॉकडाउनचा काळसुद्धा या मुलांसाठी संस्मरणीय बनून गेलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना देवदेवता, राजेरजवाडे, राजकन्या आणि राजकुमार, सर्प, आकाशाला जाऊन भिडलेलं जादूचं झाड, चोर, राजधान्या, राजवाडे आणि इतरही अनेक अद्भुतरम्य गोष्टी भेटतात. आजी-आजोबांच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकणं हा त्या मुलांसाठी एक आनंदाचा ठेवा बनून जातो आणि त्यातूनच मुलं करुणेचे धडे शिकतात, व्यवहारचातुर्य शिकतात आणि कष्ट करण्याससुद्धा तयार होतात.
भारतातील एक लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून यापूर्वी उतरलेल्या ‘आजीच्या पोतडीतील गोष्टी’च्या मालिकेतील पुढचं पुस्तक म्हणजे ‘आजी-आजोबांच्या पोतडीतील गोष्टी.’ या अजरामर गोष्टी लेखिकेने लॉकडाउनच्या काळात लिहिलेल्या आहेत. या बिकट काळातसुद्धा मनोधैर्य कायम ठेवून लोकांच्या मदतीला सतत कसं धावून जावं, हेच आपल्या छोट्या वाचकांना त्यांनी या कथांच्या द्वारे दाखवून दिलं आहे. लेखिकेच्या खास निव्र्याज, आकर्षक व सहजसुंदर शैलीत उतरलेलं हे पुस्तक एकदा वाचण्यासाठी हातात घेतल्यानंतर खाली ठेवता येणार नाही, इतकं ते रंजक आणि उद्बोधक आहे. म्हणूनच प्रत्येक बालवाचकाने आपल्या संग्रही ठेवावं, असं ते आहे.